रॉ आणि पाकिस्तान



पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी पाकिस्तानचे संयुक्त तपास पथक भारतात येण्याच्या मुहूर्तावर पाकिस्तानने कुलभूषण जाधव हेरगिरी प्रकरण जाहीर करावे येथूनच या प्रकरणाच्या खरेपणाबाबतच्या संशयाला सुरूवात होते. भारत आणि पाकिस्तानातील संबंध जरा कुठे सुरळीत होत आहेत अशी शंका येताच भारतात मोठा दहशतवादी हल्ला होतो. यावेळी पाकिस्तानी लष्कराने जरा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. यावेळी भारताच्या हेरगिरीचे प्रकरण पुढे आणले आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार कुलभूषण जाधव ऊर्फ हुसेन मुबारक पटेल हे रिसर्च अँड अनालिसिस विंग (रॉ) या भारतीय गुप्तचर संस्थेचे हेर आहेत. अलीकडेच पाकने त्यांच्या कबुलीजबाबाची ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध केली. त्यात त्यांनी आपण नौदल अधिकारी असून, रॉसाठी इराणमधून पाकिस्तानविरोधात दहशतवादी कारवाया करीत असल्याची कबुलीदिली आहे. मात्र ती बनावट असल्याचे भारतीय परराष्ट्र खात्याचे म्हणणे आहे. 
ती ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते, की त्यात अनेक विसंगती आहेत.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणतीही गुप्तचर संस्था सेवेत असलेल्या लष्करी अधिका-याचा वापर अशा प्रकारच्या गुप्तचर कारवायांसाठी करीत नसते. करायचाच झाला तर त्याला राजनैतिक संरक्षण दिले जाते. शिवाय कोणताही गुप्तहेर भारतीय पारपत्र घेऊन पाकिस्तानात कारवाया करण्यासाठी जात नसतो. त्या कबुलीजबाबात जाधव सांगतात की त्यांनी २००३ पासून हेरगिरीस सुरूवात केली. २००३ आणि २००४ मध्ये त्यांनी कराचीत काही गोपनीय कारवाया केल्या. शिवाय रॉसाठी भारतात काही कामे केली. ते पाहून रॉने २०१३च्या अखेरीस त्यांना उचललेआणि तेव्हापासून ते रॉसाठी बलुचिस्तान आणि कराचीत कारवाया करीत आहोत. यात अनेक शंकास्पद जागा आहेत. मुळात २०१३ मध्ये रॉने ज्यांना उचलले ते त्याआधी दहा वर्षे हेरगिरीच्या कारवाया कशा करीत होते?रॉसाठी भारतात काही कामे केली हे वाक्य तर हास्यास्पद आहे. याचे कारण रॉला देशांतर्गत कारवाया करण्याचा अधिकारच नाही. ते काम आयबीचे असते.
एकूणच जाधव प्रकरण हे पाकिस्तानच्या भारतविरोधी सायवॉरचा मनोवैज्ञानिक लढाईचा भाग आहे. यातून भारत हाही दहशतवादी कारवाया करणारा देश असल्याचे जगासमोर आणायचा पाकिस्तानचा डाव आहे. त्यातही भारतासाठी डोकेदुखी ठरेल अशी बाब म्हणजे भारत हेरगिरीसाठीचा तळ म्हणून इराणचा वापर करीत असल्याचे पाकिस्तानला दाखवून द्यायचे आहे. भारताविरोधात आंतरराष्ट्रीय मत कलुषित करणे आणि भारत-पाक संबंध कुठल्याही प्रकारे सुरळीत होऊ न देणे असा एका दगडात दोन पक्षी मारण्याचा हा प्रकार आहे. भारतीय परराष्ट्र खात्याने या प्रकरणाचा, जाधव हे हेर असल्याचा साफ इन्कार केला आहे. तेव्हा त्यावर विश्वास ठेवला पाहिजे.
कोणताही देश आपण दुस-या देशात हेरगिरी करतो याची जाहीर कबुली कदापि देत नसतो ही गोष्टही येथे लक्षात घेतली पाहिजे. भारताची अधिकृत भूमिका तर हीच आहे, की भारतीय उपखंडातील स्थैर्यासाठी पाकिस्तानची एकता आणि अखंडता महत्त्वाची आहे. तेव्हा पाकिस्तानातील विघटनवादी चळवळींना, दहशतवादी कारवायांना भारत कधीच खतपाणी घालीत नाही. पाकिस्तान मात्र भारतात दहशतवादी कारवाया करीत आहे आणि त्याचे अत्यंत ठोस पुरावे वेळोवेळी भारताने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानचेही नेमके हेच म्हणणे आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तानी, सिंधी अलगतावादी चळवळींमागे रॉचा हात आहे, कराचीतील काही बॉम्बस्फोट भारतीय हेरांनी घडवून आणले आहेत, असे पाकिस्तान सांगत आहे. रॉच्या दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख बी. रमण यांचे कावबॉईज ऑफ रॉहे अतिशय गाजलेले पुस्तक. त्यात त्यांनी पाकिस्तानच्या (माजी) पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा एक किस्सा सांगितला आहे. एका बैठकीत त्यांनी आयएसआयचे तेव्हाचे प्रमुख ले. जन. हमीद गुल यांना स्पष्टच सांगितले होते, की तुम्ही भारतांविरोधात शिखांचा पत्ता खेळत आहात. त्यांनी आपल्याविरोधात सिंधचा पत्ता खेळण्यास सुरूवात केली आहे. तेव्हा शिखांचे कार्ड खेळणे थांबवा आणि भारताच्या पोलिसांना हव्या असलेल्या, पाकिस्तानात राहणा-या शिख नेत्यांना भारताच्या ताब्यात द्या. पंतप्रधानपदावरची व्यक्ति आपल्या अधिका-यांच्या बैठकीत हे विधान करीत आहे ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. बी. रमण यांनी मात्र या आरोपांत तथ्य नसल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ रॉ फक्त भारतात दहशतवादी घुसणार आहेत अशा सुचना देण्याचेच काम करते का?रॉ हा दात पडलेला सिंह आहे का
रॉच्या कारवायांविषयी फार चर्चा न होणे, त्यांची कोणास फारशी माहिती नसणे यातच रॉचे निम्मे यश लपलेले आहे. रोज सकाळच्या दैनिकांत गुप्तचर यंत्रणांच्या कारवायांची माहिती येऊ लागली तर तिला गुप्तचर यंत्रणा म्हणता येणार नाही. रॉच्या अशा अनेक कारवाया गोपनीयतेच्या पडद्याआड दडलेल्या आहेत. काहींची काही माहिती मात्र बाहेर आली आहे आणि भारत आक्रमक नसला, तरी जशास तसे उत्तर देणारा देश आहे एवढे त्यातून चांगलेच स्पष्ट होत आहे.
(माजी) पंतप्रधान इंदिरा गांधी आणि जगभरातील हेरयंत्रणांत ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते ते भारतीय गुप्तचरांचे पितामह रामेश्वर नाथ काव हे रॉचे संस्थापक. २१ सप्टेंबर १९६८ रोजी या संस्थेची स्थापना झाली. तिची पहिली अत्यंत यशस्वी कामगिरी म्हणजे पाकिस्तानची फाळणी. बांगलादेशात मुक्तिबाहिनी, कादरबाहिनी अशा बंडखोरांच्या संघटना उभारून रॉने पाक लष्कराला सळो की पळो करून सोडले होते. हे युद्ध सुरू होण्यापूर्वी, जानेवारी १९७१ मध्ये दोन काश्मिरी दहशतवाद्यांनी एका भारतीय विमानाचे अपहरण करून ते लाहोरला नेले होते. तेथे त्यांनी सर्व ओलिसांची सुखरूप सुटका केली, पण विमान बॉम्बने उडवून दिले. या घटनेनंतर इंदिरा गांधी यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी पाकिस्तानच्या विमानांना भारतीय हवाई हद्दीतून जाण्यास बंदी घातली. त्यामुळे पाकिस्तानच्या पूर्व पाकिस्तानशी असलेल्या हवाई संबंधात बाधा आली. ही बाब बांगलायुद्ध जिंकण्यात महत्त्वपूर्ण ठरल्याचे बी. रमण यांनी म्हटले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे ज्या घटनेमुळे हा निर्णय घेतला गेला ते विमान अपहरण हा सगळा रॉचा बनाव होता. रॉचे माजी अधिकारी आर. के. यादव यांनी त्यांच्या मिशन आर अँड एडब्लूया पुस्तकात म्हटले आहे की या विमानाचे अपहरण करणारा हाशिम कुरेशी हा रॉचा एजंट होता. त्याला पाकव्याप्त काश्मिरात पाठविण्यात आले होते. तेथे तो पाकिस्तानला मिळाला. पण रॉने त्याला पकडले. चौकशीत त्याने सांगितले की राजीव गांधी चालवित असलेल्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करण्याचा आयएसआयचा डाव होता. काव यांनी त्याचा बरोबर उपयोग करून घेतला. कुरेशीला त्यांनी फितवले आणि ठरल्याप्रमाणे विमान अपहरण करण्यास सांगितले. त्यासाठी व्यवस्थित बनाव रचण्यात आला. तो यशस्वीही झाला. पाकिस्तानच्या फाळणीचा इंदिरा गांधींचा डाव यशस्वी होण्यास त्याची मदत झाली. 
बांगलादेशच्या निर्मितीचे श्रेय जसे रॉचेही आहे. त्याचप्रमाणे सिक्किमच्या विलिनीकरणाचे श्रेय इंटेलिजन्स ब्युरो - आयबीचे. ही भारतांतर्गत कार्यरत असलेली गुप्तचर यंत्रणा. आयबीचे माजी संयुक्त सचिव टी. व्ही. राजेश्वर यांच्या इंडिया – द क्रुशिअल इअर्स, तसेच आयबीचे माजी संयुक्त सचिव मलॉय कृष्ण धर यांच्या ओपन सिक्रेट्सया पुस्तकांतून सिक्कीमच्या विलिनीकरणाची हकीकत समोर येते. यात अर्थातच रॉचाही काही प्रमाणात सहभाग होता. आर. के. यादव सांगतात, सिक्कीमचे तत्कालिन महाराज सर ताशी नामग्याल यांनी ज्या होप कूक या अमेरिकी महिलेशी विवाह केला होता, तिचे सीआयएशी संबंध होते आणि सिक्कीम स्वतंत्र राखण्याचा त्यांचा कट होता. तो भारतीय गुप्तचरांनी उधळून लावला. 
पाकिस्तानने खलिस्तानवादी चळवळ सुरू करून भारतात अशांतता माजविली हे सगळेच जाणतात. पण त्या काळात भारतानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले होते याची माहिती अनेकांना नसते. बी. रमण यांच्यानुसार, ए. के. वर्मा हे रॉचे प्रमुख असताना त्यांनी अशा कारवाया सुरू करून पाकिस्तानला धूळ चाटण्यास लावले होते. रमण सांगतात, १९८९ मध्ये राजीव गांधी निवडणूक हरले नसते आणि वर्मा हे आणखी तीन-चार वर्षे त्यांच्या हाताखाली रॉचे प्रमुख म्हणून राहिले असते, तर पाकिस्तानचे स्वरूप आज दिसते तसे राहिले नसते आणि जिहादी दहशतवाद्यांकडून आपल्या देशातील निरपराध नागरिक जसे उंदरांसारखे मारले जातात तसे झाले नसते.“ राजीव गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात पाकिस्तानात सिंधुदेश चळवळ जोरात सुरू होती आणि तिचे प्रणेते जी. एम. सैद याच काळात भारतात येऊन राजीव गांधी यांना भेटून गेले होते. बलुच राष्ट्रीयवादी चळवळीचे खान अब्दुल वली खान यांसारखे अफगाणिस्तानच्या आश्रयाला असलेले नेते राजीव गांधी यांना भेटत होते आणि त्याचवेळी अफगाणची खाद ही गुप्तचर यंत्रणा आणि रॉ यांच्या प्रमुखांच्या गोपनीय बैठका सुरू होत्या. पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी बंद केलेली रॉची सायवॉर डिव्हिजनही राजीव गांधी यांनी पुन्हा सुरू केली होती. तिला बळ दिले होते. रमण सांगतात, व्ही. पी. सिंग यांच्या काळात जेव्हा काश्मीरमध्ये दहशतवादाने थैमान घातले तेव्हा या सायवॉर डिव्हिजनने काश्मीरमध्ये खूप चांगलेकाम केले. या गोष्टी यासंदर्भात लक्षणीय आहेत. रॉचे सीआयटी-एक्स हे हेरगिरी विरोधी पथक कशा दहशतवादी कारवाया करीत असते याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा पाकिस्तानी थिंकटँक्सच्या संकेतस्थळांवरून सांगितल्या जातात त्या अगदीच काल्पनीक असतात असे म्हणूनच म्हणता येत नाही. यात पाकिस्तानात बनावट चलन, अंमली पदार्थ पसरवणे येथपासून अलगतावादी चळवळींना बळ देणे येथपर्यंतच्या कारवायांचा समावेश असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. याच्या पुष्ट्यर्थ वेळोवेळी रवींद्र कौशिक, मोहनलाल भास्कर, सरबजीतसिंग यांसारख्या हेरांचे पुरावे मांडले जातात. यातील सरबजीतसिंग हे हेर होते की काय याबद्दल शंका आहे, परंतु कौशिक आणि भास्कर हे मात्र हेर होते. कौशिक यांचा पाकिस्तानी तुरूंगातच मृत्यू झाला. भास्कर यांची सुटका कवी हरिवंशराय बच्चन यांच्यामुळे झाली. बच्चन तेव्हा स्वीस दूतावासात कार्यरत होते. पुढे कौशिक यांनी आपल्या त्या अनुभवांवर अन इंडियन स्पाय इन पाकिस्तानहे पुस्तक लिहिले. त्यावर एम. के. धर यांची ऑपरेशन ट्रिपल एक्सही कादंबरीही प्रकाशित झाली आहे. 
अशा पुस्तकांतून रॉच्या कारवायांवरील पडदा काहीसा किलकिला होतो आणि जाणीव होते, की आपल्याही गुप्तचर संघटना आहेत आणि त्यांचीही छाती चांगलीच रुंद आहे, अगदी पहिल्यापासून...