गेल्या मार्चमधील ही बातमी. गोव्याच्या किनारपट्टीपासून आत समुद्रात एका छोट्याशा बोटीवर अडकलेल्या एक महिलेची तटरक्षक दलाच्या बोटींनी सुटका केली. ती होती संयुक्त अरिब अमिरातीतली. तिला इकडे ताब्यात घेण्यात आले आणि परत दुबईला पाठवून देण्यात आले. अनेक मराठी वृत्तपत्रांनी तर या बातमीची दखलही घेतली नव्हती. वरवर पाहता त्यात दखल घ्यावे असे काही नव्हतेही. एक गोष्ट महत्त्वाची होती त्यात. ती म्हणजे ती महिला तेथील राजघराण्यातील होती. पण दुर्लक्षलीच गेली ती बातमी.
त्यानंतरची एक बातमी. मे महिन्यातली. अनेक वृत्तपत्रांच्या देशविदेश पानावर कुठेतरी कोप-यात लागलेली, की - ऑगस्ता वेस्टलॅंड हेलिकॉप्टर दलाली प्रकरणातील एक आरोपी ख्रिस्तियन मिशेल जेम्स याच्या विरोधात संयुक्त अरब अमिरातीच्या न्यायालयात पुरेसे पुरावे सादर करण्यात भारतास अपयश. मायकेलला भारतात आणण्याच्या प्रयत्नांना खीळ. आपल्या दैनंदिन विचारविश्वात अशा प्रकारच्या बातम्यांना स्थान असतेच कुठे?दिल्लीतील राजकीय वर्तुळात तिने काही खळबळ माजवली असेल, च्यानेली चर्चांत ती कुठे झळकळी असेल, तेवढेच.
आता अशा बातम्यांची ही गत. तर मग गेल्या आठवड्यात अर्जेंटिनातील जी-२० शिखर परिषदेत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी राजे मोहम्मद बिन सलमान यांच्या भेटीचे ते काय कौतुक?सौदी पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येत या राजेसाहेबांचा हात असल्याचा संशय जगभरात घेतला जातो. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. अशा व्यक्तीची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भेट घेतली म्हणून काहींनी मोदींवर टीका केली. पण आपणही अशा नैतिक वगैरे बाबींना फारसे गांभीर्याने घेत नाही. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या प्रांतात असे चालतेच असे समजून आपण त्याकडे काणाडोळाच करतो.
त्यामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बिन झाएद अल नाहयान यांच्याशी ख्रिस्तियन मिशेलच्या प्रत्यार्पणाबाबत चर्चा केल्याची बातमीही आपल्याही नजरेआडच राहिली. हे सारे स्वाभाविकच आहे.
या सा-या सुट्यासुट्या घटना. त्यांचे सर्व बिंदू एकत्र जोडले, की मग मात्र आपल्यासमोर एक मोठे चित्र उभे राहते.